
पालघर :
दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा थेट लाभ पोहोचावा, या उद्देशाने केंद्रवर्ती अर्थसंकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या न्यूक्लियस बजेट योजनेसाठी अर्ज वाटप व संकलनाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या योजनेचा लाभ या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजाला मिळावा, यासाठी २३ जानेवारी पर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दुर्गम भौगोलिक परिस्थिती, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आदिवासी कुटुंबे शासकीय योजनांपासून वंचित राहतात. ही दरी भरून काढण्यासाठी प्रशासनाने थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला असून, विविध ठिकाणी अर्ज वाटप व संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू (जि. पालघर) कार्यालयामार्फत अजय रजपूत (7709902041)(लिपीक-टंकलेखक) यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत अर्ज वाटप व संकलन केले जाणार आहे. तसेच तलासरी व कासा परिसरात स्मिता वरखंडे (8408931421)आणि सदानंद भोये (8999753117)(लिपीक-टंकलेखक) यांच्या माध्यमातून अनुक्रमे मुलांचे नवीन वसतीगृह, तलासरी तसेच मुलींचे वसतीगृह, कासा येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
टेंभोडे येथील स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र येथे युवराज करनकाळे(9892223690), तर मनोर परिसरातील शासकीय प्राथमिक आश्रमशाळा, टाकवहाळ येथे संकेत फसाटे(7798562648) यांच्याकडे अर्ज वाटप व संकलनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून, लाभार्थ्यांना थेट संपर्क साधता येणार आहे.
या उपक्रमामुळे दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या न मारता, जवळच्या ठिकाणीच न्यूक्लियस बजेट योजनेचे अर्ज मिळणे आणि सादर करणे सुलभ होणार आहे. अधिकाधिक लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी केले .
