वाढवण बंदर प्रकल्पाला वेग

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक

पालघर दिनांक १७ फेब्रुवारी : मौजे वाढवण, ता. डहाणू येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्यात आली असून जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली.
  यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री (दूरदृष्य प्रणाली द्वारे) उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, श्याम मदनुकर,  भूमी अभिलेख अधीक्षक नरेंद्र पाटील, पालघर तहसीलदार  रमेश शेंडगे, डहाणू तहसीलदार  सुनिल कोळी तसेच मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
    प्रकल्पासाठी आवश्यक रस्ता व रेल्वे उभारणीसाठी जमीन संपादनाची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, 1956 च्या कलम 3(A) अन्वये दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून पालघर जिल्ह्यातील एकूण 24 गावांचा यात समावेश आहे. त्यापैकी डहाणू तालुक्यातील 10 व पालघर तालुक्यातील 14 गावांतील जमिनींचे संपादन निश्चित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

*निश्चित दर जाहीर*
पालघर तालुक्यामधील बहुतांश गावांसाठी शेतजमिनीचा दर प्रति हेक्टर 62 लाख 50 हजार रुपये निश्चित करण्यात आला असून बिनशेती जमिनींसाठी गावनिहाय प्रति चौ.मी. 780 ते 2940 रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत.
डहाणू तालुक्यातील वरोर, चिंचणी, तणाशी या गावांसाठी शेतजमिनीचा दर 1 कोटी 16 लाख 44 हजार 106 रुपये प्रति हेक्टर, तर बावडे, कोलवली, वाणगाव या गावांसाठी 1 कोटी 22 लाख 42 हजार 408 रुपये प्रति हेक्टर असा निश्चित करण्यात आला आहे. काही गावांसाठी 62 लाख 50 हजार रुपये प्रति हेक्टर दर लागू राहील.
सदर सर्व निवाडे संपादन संस्था National Highways Authority of India (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते आणि त्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी दिली.
      प्रकल्पग्रस्तांना निश्चित बाजारमूल्याच्या दुप्पट (2 पट) रकमेचा मोबदला देण्यात येणार आहे. त्यासोबतच त्या रकमेवर 100 टक्के दिलासा रक्कम, तसेच 29 ऑगस्ट 2024 पासून मूळ दरावर 12 टक्के अतिरिक्त घटक (व्याज) देण्यात येणार आहे.
जमिनीवरील बांधकाम, झाडे, विहीर, बोअरवेल आदी मालमत्तांचे मूल्यांकन करून स्वतंत्र नुकसानभरपाईही दिली जाणार आहे. त्यामुळे बाधित खातेदारांना कायदेशीर तरतुदींनुसार अधिकतम आर्थिक संरक्षण मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

आवश्यक कागदपत्रे सादर करने बंधनकारक*
संपादित क्षेत्राचा मोबदला स्वीकारण्यासाठी 60 दिवसांच्या आत अद्ययावत 7/12 उतारा, फेरफार नोंदी, ओळखपत्र, बँक पासबुक (IFSC सहित), वारस हक्काचा पुरावा (लागू असल्यास) आदी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
पालघर तालुक्यासाठी सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे तर डहाणू तालुक्यासाठी सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सुर्या प्रकल्प, डहाणू येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले .
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी संबंधित तलाठी कार्यालयांना सुविधा केंद्राच्या स्वरूपात कामकाज करण्याच्या सूचना दिल्या असून महसूल अभिलेख अद्ययावत करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले .
“भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता, वेग आणि न्याय सुनिश्चित करणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. बाधित नागरिकांनी वेळेत कागदपत्रांची पूर्तता करून मोबदला स्वीकारावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top